राघोबा गणपतराव.

      पारावरच्या गप्पा आता रंगात आल्या होत्या...आधीच डोक्यावर ऊन आलं होतं पण प्रचंड विस्तारलेल्या वडाच्या फांद्यांमुळे ऊन्हाचा एक कवडसा देखील आरपार खाली येत नव्हता.अधून मधून येणाऱ्या हवेच्या झोक्यामुळे जूनीजाणती पानं अलगद गळून पडत होती.सत्तरीतल्या  सहा मित्रांसाठी हा पार म्हणजे वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमचा जागतिक विचार मंच म्हणावा असाच होता.कारण दररोज पहाटेच्या वेळी शेतावर जावून दिवसभराच्या कामाचा सगळा आढावा घेवून दुपारी ही जत्रा चावडीवर बसून सगळे पेपर वाचून अक्षरशखांडोळा करत असत,निधनवार्ता-बाजारभाव यांचा आढावा घेत असत,राजकारण-क्रिकेट पासून ते अमेरिका-चीन-रशियाच्या सामरिक धोरणांवर चर्चेच्या फैऱ्या झाडत असत.

       ऐतवार होता आज.गाव तसं शांतच होतं.दुपारचा - चा सुमार असेल,श्यामराव डोक्यावरचा पटका सोडून पुन्हा बांधत होते.पुढच्या महिन्यात असलेल्या गावच्या जत्रेवर चर्चा करत बसले होते सगळे.तेवढ्यात गणपतरावांच्या फोनची नोकिया टोन वाजायला लागली.बंडीतून मोबाईल काढून गणपतरावांनी फोन उचलला.फोनवरचं संभाषण ऐकून गणपतरावांना चक्करच् आली,जागेवरच् कोसळले बिचारे.मास्तरांनी फोन हातात घेवून पुन्हा बोलणी केली तेव्हा त्यांना समजलं की विहिरीत पडून ‘राघोबा’ गेला. “राघोबा गेला!” ऐकून सगळ्यांना धस्सं झालं.पाटलांनी आपली कोल्हापूरी काढून गणपतरावांना हुंगवली तसं त्यांनी डोळे उघडले.

        राघोबा’, गणपतरावांचा एकुलता एक बैल.बायको जावून  वर्ष झाली असतील,गणपतराव वाड्यात एकटेच राहायचे,कष्टाच् शरीर,तब्येतीने धटदाकट.गावात गणपतरावांचा मोठ्ठा वाडा होता,शेतीतल्या धन-धान्यांनी  उभारलेला,शेतीतल्या श्रीमंतीचं दर्शन घडवणारा.बायको गेली तसं मुलांनी त्यांना शहरात चलायचा आग्रह केला पण आख्खं आयुष्य गावात खर्ची केलेल्या या इसमाला शहरातलं बंदिस्त वातावरण तितकेसे आवडत नसे,गुदमरायला लावत असे.आणि ‘राघोबावर त्यांचा  त्यांच्या बायकोचा विशेष जीव होता.दोघं नवरा-बायको स्वत:च्या लेकरासारखं राघोबाला जपत असत.जीव लावत असत.शेताची सगळी कामं एकटा राघोबा ताकदीने करत असत.ताकदीचा बैल म्हणून इतर शेतकरी खूपवेळा गणपतरावांना विचारत असत.पण गणपतरावांना लाखभर रुपयांच्या पैश्यापेक्षा राघोबाची असलेली ‘भावनिक सोबत’  जगायला अर्थ देत होती.बायकोच्या पश्चात गणपतराव राघोबासोबत तासनतास गप्पा मारत असत.त्यांचं बोलणं त्या बिचाऱ्याला किती समजत असे हे माहित नाही पण त्या वातावरणातली रुक्ष शांतता त्यांच्या आवाजात भंग पावत असे.गळ्यातील घुंगराचा आवाज वाड्यात मधुर संगीत निर्माण करत असे.राघोबाच्या पोळ्याला हात लावून त्याला गोंजारताना राघोबा शहारत असे.शिंगाना हलवून राघोबा गणपतरावांना साद देत असे.एक वेगळं नातं गणपतराव आणि राघोबांमध्ये बनलेलं होतं,शब्दातीत.आणि केवळ राघोबाला एकटे सोडायला नको हे कारण गणपतरावांना शहरात मुलांकडे  जाण्यासाठी पुरेसं असे.आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचा धक्का  गणपतरावांना जोरात बसला.मित्रांनी गणपतरावांना सावरलं आणि सगळे मित्र फटफटीला किक मारुन वावराकडे निघाले...

        विहिरीत आत डोकावताना गणपतरावांसह इतरांना पण वाईट वाटत होते.पाण्यात राघोबा शांत निजलेला होता.इतक्यात क्रेन वाला आला.काही वेळात राघोबाला वर काढलं गेलं तसं गणपतरावांनी राघोबाला घट्ट मिठी मारली.नेहमी कान टवकारणारा राघोबा आज शांत शांत होता.गणपतरावांच्या डोळ्यांतून आसवं गळत होती पणत्यांच्या प्रत्येक शब्दामागं फक्त गळ्यातील घुंगराचा आवाज येत होता.दररोज होणारा या दोन मित्रांमधला संवाद अखेर संपला होता.मित्रांनी वावरात खड्डा खणला.राघोबाला तिथंच पुरुन तासभर सगळे तिथंच बसले,निशब्दसगळेजण  पुन्हा गावात परतले.

       आज रात्री गणपतरावांना जेवन गेलंच नाही.राघोबाच्या मोकळ्या खुंटीकडे ते एकटक बघत बसले...वैरणीची पेंड तशीच बाजूला पडली होती...दररोजचा घुंगराचा आवाज आज कानावर येत नव्हता.वर माळ्यावर अडकवलेली बेंदराची झूल बघून गणपतरावांना काय वाटलं ठावूक नाही पण त्यांनी ती झूल खाली काढून आपल्या छातीला कवटाळून घेतली.खोंड असताना दुडूदुडू मारलेल्या उड्या,वावरात नांगरताना केलेली कामे,बैलगाडीला जुंपल्यावर डांबरी सडकेवर पळणाऱ्या खुर्र लावलेल्या टापामाश्या उडवून लावताना वळवळणारी शेपटी,तलावावर पाणी मारल्यावर चकाकणारी पांढरी शुभ्र मुलायम काया आणि वाड्यात वैरण खाताना लाळेचा होणारा फेस सगळं सगळं दृश्यादृश्य गणपतरावांच्या नजरेसमोर उभं राहत होतं.पण आता ‘तो’ फक्त ‘आठवणीचा बेंदूर’ मागे सोडून निघून गेला होता.राघोबाची आयुष्याची रहाटगाडी कायमची थांबली होती.दोन जीवांमधलं प्रेम मात्र आठवणींच्या हुंदक्यात अमर होत होतं.जीवाला जीव देणारा राघोबा जमिनीच्या कुशीत शांत झोपला  होता,कायमचा.

      एखाद्या पुस्तकातील एखादं महत्त्वाचं पान फाटून गेल्यावरही त्या फाटक्या पानाच्या तुकड्यावर आपलं विशेष लक्ष जावं अन् त्या आठवणींचा तुकडा कळत नकळत जतन करावा कदाचित हे सुद्धा प्रेम असावं...मनांतलं...आत आत खोल दाटलेलं.



©सुजित


Comments

  1. मनाला हळवरणारी गोष्ट... खूपच सुंदर...👌👌👌👌

    ReplyDelete
  2. थॅंक्स अनघा...😊

    ReplyDelete
  3. नेहमी प्रमाणे अप्रतिम शब्दरचना💐💐💐

    ReplyDelete
  4. धन्यवाद निलेशराव🙏🏼😊

    ReplyDelete
  5. Dolyasmor ti ghatana ubhi rahili an vedanahi manat !

    ReplyDelete
  6. थॅंक यु शब्दप्रणाली🙏🏼☺️

    ReplyDelete
  7. Subscribe करतांना खुपचं कठीण करून टाकले आहे एव्हढं तर atm मधून पैसे काढतांना सुद्धा सुरक्षा नसते

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गीत गुंजन🙏🏼🤗🤗

      Delete
  8. हृदयस्पर्शी

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रीकांतराव🙏🏼

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल